Wednesday, 25 January 2023

जन्म मृत्यू

जन्म मृत्यू चे चक्र अव्याहत....सत्पुरुष
             
जन्म-मृत्यू-जन्म हे जे अव्याहतपणे चक्र सुरू असते, त्या चक्रातून फिरण्याची जी शिक्षा प्रत्येक जीवाला भोगावी लागते, त्यातून साधक-भक्ताची निश्चितपणे सुटका होते.  ह्यावर आपले* 
*चिंतन-भारले भाष्य करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, ऊसापासून साखर करतात, परंतु साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण करता येईल का? दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी; लोण्यापासून तूप ही प्रक्रिया, परंतु त्या तुपाला पुन्हा घुसळून दूध निर्माण करता येईल का? ही अशक्य गोष्ट आहे. नदी उगमापासून सुसाट सुटते, वाटेतले सर्व अडथळे दूर करीत, समुद्राला जाऊन मिळण्यासाठी. ती समुद्र होऊन जाते. एकदा समुद्राला आपले अस्तित्व अर्पण केल्यावर नदी कधी तरी माघारी उगमापाशी येणे शक्य आहे का? ते शक्य झाले तरच हरीचे दास मोक्षपद न मिळवता पुन्हा माघारी जन्म घेतील. जे परम भक्त विविध प्रकाराने देवाची भक्ती करतात, नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या अथक साधनेच्या बळावर पार करतात, ते भाग्यवान जीव हा भवसागर पार करून जातात. कापूर हा सुगंध अर्पण करतो. कापूरापासून शाई होत नाही. परंतु कापूराच्या शाईने जर अभंग लिहिता आले असते तर आपली जी छाया पडते ती आपल्याला आपल्याच हाताने चक्क उचलून घेता येईल. पण हे अशक्य आहे. श्रीज्ञानदेव म्हणतात की, ‘परमेश्वराची जे आर्त होऊन उपासना करतील, अखंड नामस्मरणात अष्टौप्रहर दंग होऊन त्याच्याच नामाच्या कुशीत आनंदात राहतील ते ह्या मर्त्य विश्वात कदापिही जन्म घेणार नाहीत.’ ज्ञानदेव महाराज खात्रीपूर्वक सर्वच परम भक्तांना असं वचन देतात.
शेत नांगरण्यापूर्वी ते जाळतात. आधीच्या पिकाचे जे शिल्लक असेल ते जाळतात. तसे, माझ्या प्रापंचिक वासना सगळ्या नाहीशा केल्याशिवाय परमात्मा येणार नाही. यासाठी महाराज दोन मार्ग सांगावयाचे. एक मार्ग- त्या प्रपंचाला आगच लावून टाकायची, पण ही फार मोठ्या माणसांची कामे आहेत. दुसरा मार्ग जर असेल तर ते शेत भगवंताच्या मालकीचे करावयाचे. मग सद्गुरूची खुबी अशी आहे म्हणाले की तो ते शेत न जाळता बरोबर करून घेईल. हे त्याचे काम आहे. पण मग त्याला तू अमुक कर म्हणून सांगता येणार नाही. ज्ञानामध्ये विरक्तीशिवाय उपाय नाही म्हणतात; परंतु भक्तीमध्ये "हे तुझे आहे तू सांभाळ" असे म्हणल्यानंतर त्याला काय करावयाचे ते तो करील. प्रापंचिक मनुष्य काही पूर्व पुण्यायीने सत्पुरुषाजवळ जातो. त्याला देव नको असतो, प्रपंच व्यवस्थित हवा असतो. हा सत्पुरुष काय करतो तर, एखादीजमीन मुरुमानी भरलेली असते. शेतकरी जसे दोन चार फूट खोल मुरूम काढतो, त्यात नवी माती घालतो, खत घालतो आणि पीक काढतो, तसे हा सत्पुरुष हळूहळू त्याच्या मनातला प्रपंच बाजूला करतो, त्यात भगवंताच्या नामाचे बीज पेरतो आणि पीक काढतो. त्याचे पीक बेताचेच आले तरी आल्याशिवाय राहात नाही. ही त्या सत्पुरुषाची कर्तबगारी आहे.

“सकळ जन हिताय 
श्री स्वामी समर्थाय नमो नमः” 
अवधुतचिंतन जय श्री गुरुदेव दत्त 
दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंमरा 
ब्रम्हां विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
Il ॐ श्री स्वामी समर्थ ll

No comments:

Post a Comment