विवेचन सारांशज्ञान, कर्म, भक्तीयोग आणि परमात्म्याची प्राप्ती
या जीवन संघर्षात जे शाश्वत ज्ञानाकडे आपले लक्ष केंद्रित करू इच्छितात त्या सर्वांसाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
अहो अर्जुनाचिये पांती | जे परिसणया योग्य होती।
तिहीं कृपा करून संतीं | अवधान द्यावे ॥ १.६२॥
अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता असलेले आणि त्या पंक्तीत बसून हे गीता आख्यान ऐकण्याची योग्यता असलेले असे हे संत श्रोते समोर बसले आहेत त्यांनी कृपा करून अवधान द्यावे ।।१.६२।।
अशा या गीतेच्या मध्यभागी स्थित असलेल्या सुंदर नव्या अध्यायाच्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करूया.
या अध्यायाच्या सुरुवातीला आपण जीव, जगत आणि जगदीश्वर यांचा परस्पर संबंध पाहिला. परमात्म्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती कशी कार्य करते हेही आपण पाहिले. परमात्म्याला न जाणणारे तसेच जाणूनही न मानणारे असे लोक व्यर्थ जीवन जगतात आणि या सृष्टीसाठी ते कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करत नाहीत. त्यानंतर भगवंत दैवी संपत्तीने युक्त अशा महात्म्यांचे वर्णन करतात. परमेश्वराशी एकाकार होणारे, अनन्य भावाने त्याची भक्ती करणारे, सृष्टीचे कल्याण करण्यासाठी कर्म करणारे आणि या सृष्टीच्या हितासाठी आपल्या जीवनाची काहीतरी आहुती देणारे या सृष्टीत असतात आणि त्यामुळेच सृष्टीची उन्नती होत असते.
9.22
अनन्याश्चिन्तयन्तो मां(य्ँ), ये जनाः(फ्) पर्युपासते।
तेषां(न्) नित्याभियुक्तानां(य्ँ), योगक्षेमं(व्ँ) वहाम्यहम्॥9.22॥
तसेच दुसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 'अनन्य' हा शब्द. अनन्य याचा अर्थ न अन्य म्हणजे केवळ श्रीराम, श्रीकृष्ण, अल्ला असा नसून एकच परमात्मा विविध रूपात सर्व सृष्टीचे नियंत्रण करत आहे. ज्ञानधारा जिथून प्रवाहित झालेली आहे त्या ठिकाणाहून इतरही अनेक ज्ञानधारा प्रवाहित होत असतात. परंतु केवळ मी मानतो तेच परमात्म्याचे स्वरूप आहे असे मानणे ठीक नाही. यामुळे सांप्रदायिकता वाढते. अनन्य या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे अशी भावना वाढते की केवळ माझाच परमात्मा बरोबर आहे, माझीच उपासना बरोबर आहे आणि इतरांनी केवळ त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. या भावनेने या जगात युद्धेही होतात. शिव, विष्णु, जगदंबा इत्यादींपैकी जे रूप आपल्याला भावेल त्या रूपात आपण परमात्म्याची उपासना करू शकतो. परंतु भगवंताची सर्व रूपे ही एकाच परमात्म्याची स्वरूपे आहेत. त्या इतर स्वरूपांचाही आपण आदर केला पाहिजे. आपण सर्वांनी 'विंग्स ऑफ फायर' हे पुस्तक वाचले असेल. आपले आदरणीय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ते लिहिले आहे. ते रामेश्वर येथे राहायचे. त्यांचे वडील तेथील मशिदीचे मुख्य मौलवी होते. तेथे शाळेत त्यांचा मित्र लक्ष्मण हा रामेश्वर मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांचा मुलगा होता. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की मशिदीत होत असलेली बांग आणि रामेश्वर मंदिरातील आरतीच्या वेळी वाजणाऱ्या घंटा या एकाच परमात्म्याला आळविण्यासाठी आहेत याबद्दल त्यांच्या मनात किंचितही शंका नव्हती. तसेच ही गोष्ट दोघांचेही वडील आपापल्या मुलांना सांगत असत.
या श्लोकात पुढे भगवान एक अभिवचन देतात. येथे भगवंतांनी नित्य अभियुक्त अशा सुंदर शब्दाचा उपयोग केला आहे. युक्त याचा अर्थ आहे चिकटलेला आणि अभियुक्त या शब्दाचा अर्थ आहे चारही दिशांनी, बाजूंनी चिकटलेला. त्यामुळे नित्य अभियुक्त याचा अर्थ होतो "जो सतत चारही बाजूंनी परमात्म्याला चिकटलेला किंवा लिप्त आहे असा." याचे वर्णन करताना स्वामीजींनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील लाट ही समुद्राला सर्व बाजूंनी चिकटलेली असते त्याप्रमाणे हा नित्य अभियुक्त भक्त असतो असे स्वामीजी म्हणतात. भगवंत पुढे म्हणतात अशा भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. आपण भगवंताची भक्ती कधी कधी करतो. तसेच ती करत असतानाही बऱ्याच वेळा भोगांसाठी आणि कामनापूर्तीसाठी करतो. ज्याप्रमाणे एखादा मुलगा त्याची अडचण सोडवण्यासाठी इतरत्र मदतीसाठी धावला आणि नंतर त्याच्या पित्याकडे गेला तर तो पिता निश्चितच "तू आधीच माझ्याकडे का आला नाहीस" असे बोलून दाखवेल. तसेच आपणही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या परमात्मारूपी पित्याकडे प्रथम गेले पाहिजे. प्रापंचिक माणसासाठी ते योग्यही आहे. परंतु येथे भगवान अशा व्यक्तींबद्दल न बोलता जो नित्य अभियुक्त भक्त असतो अशा भक्ताबद्दल बोलत आहेत. असे भक्त परमात्म्याशी अभिन्न राहून आणि त्याच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करतात.
रामकृष्ण परमहंस असेच काली मातेशी एकरूप झाले होते. जेव्हा त्यांना कॅन्सर झाला तेव्हा ते मिठाई खाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांना फार दुःख व्हायचे. एकदा ते ठाकुरजींना म्हणाले आपण आपली एकाग्रता आपल्या गळ्याशी केंद्रित का करत नाही? आपले दुखणे आपणच बरे करू शकाल. यावर रामकृष्ण म्हणाले, "अरे वेड्या माझे मन जगदंबेच्या चरणी पूर्णपणे एकाग्र झाले आहे. माझ्या मनात इतर कुठलेही विचार येत नाहीत. मन जगदंबेच्या चरणापासून हटवून या नश्वर देहाचे- गळ्याचे -चित्र त्या मनात मी कसे चिकटवू शकतो? असे होऊ शकत नाही." याला अनन्य भक्ती म्हणतात. स्वामी विवेकानंदही असेच होते. सर्व संत महात्मे असेच असतात. त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते परमेश्वराशी असलेले अनुसंधान सोडत नाहीत. स्वामी विवेकानंदांवरही अनेक संकटे आली. त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. स्वामी विवेकानंदांचे वडील फार उदार होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर खूप मोठे कर्ज झाले. घराचाही लिलाव झाला. तेव्हा स्वामी विवेकानंद रामकृष्णांकडे आले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही कालीमातेची प्रार्थना करा आणि माझ्या उपजीविकेची व्यवस्था करावयास सांगा. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, "मी तर जगदंबेपाशी अशा कुठल्याही भौतिक गोष्टी मागत नाही. तूच जगदंबेपाशी जाऊन का मागत नाहीस? तू तर सगुण भक्तीच्या विरोधात आहेस. पण ठीक आहे आज मंगळवार आहे तू देवीच्या गाभाऱ्यात जा आणि देवीपाशी तुला जे मागायचे ते मागून घे." स्वामी विवेकानंद कालीमातेच्या गाभाऱ्यात गेले. साक्षात कालीमातेने त्यांना दर्शन दिले. काली मातेच्या तेजाने विवेकानंद प्रभावित झाले. ते काली मातेला म्हणाले, "आई मला भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे!" बाहेर आल्यावर रामकृष्णांनी विचारले की जे मागायचे ते मागितलेस का? विवेकानंदांनी "नाही" असे उत्तर दिल्यानंतर ठाकुरजींनी त्यांना पुन्हा गाभाऱ्यात पाठवले. परंतु विवेकानंद कालीमातेला भौतिक गोष्टी मागू शकले नाही. असे तीन ते चार वेळा झाले. ते कालीमातेपाशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एवढेच मागू शकले. ही अनन्य भक्ती होय.
परमात्म्याकडे नश्वर गोष्टी मागण्यापेक्षा शाश्वत गोष्टी मागण्याची ज्यांची वृत्ती असते अशा भक्तांचा योगक्षेम भगवंत चालवतात.
योग म्हणजे जोडणे. आपल्याकडे जी गोष्ट नाही ती गोष्ट प्राप्त करणे म्हणजे योग आणि ह्या प्राप्त झालेल्या गोष्टीचे संरक्षण म्हणजे क्षेम. आपले संपूर्ण आयुष्य या दोन गोष्टीतच खर्च होते, प्राप्त न झालेल्या गोष्टी मिळवणे आणि त्या प्राप्त झाल्यानंतर त्याचे संरक्षण करणे. येथे भगवंत म्हणतात जे लौकिक गोष्टी विसरले आहेत अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो.
योगक्षेम या शब्दाची व्याख्या अशी करतात
अप्राप्तस्य प्राप्तिः योगः, प्राप्तस्य परिरक्षणं क्षेमः।
अप्राप्य गोष्टी प्राप्त करणे म्हणजे योग आणि प्राप्त झालेल्या गोष्टींचे रक्षण करणे म्हणजे क्षेम.
भक्ताला आवश्यक असणाऱ्या गोष्टी देणे आणि त्यांचे रक्षण करणे हे भगवंत करतात. या संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण भगवंत करतात. मातेच्या गर्भात असलेल्या गर्भाला अन्न पुरवण्याची व्यवस्था सुद्धा भगवंतच करतात. जेव्हा तो जीव गर्भाच्या बाहेर येतो तेव्हा त्याच्या क्षुधापूर्तीसाठी भगवंत मातेच्या स्तनात दूध निर्माण करतात.
ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर ओवी आहे
आपुली तहान भूक नेणें । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ९-३४० ॥
आपली तहान भूक काही न जाणणाऱ्या लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंत:करणपूर्वक भजतात त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. ॥९-३४०॥
मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।
जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ९-३३९ ॥
मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षिण जगते, ॥९-३३९॥
चक्षु म्हणजे नेत्र हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि पंख हे पुरुषार्थाचे प्रतीक आहे. अनन्य भक्ताच्या सर्व गरजा भगवंत भागवतात.
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां ।
या सृष्टीचे संचलन करण्यासाठी प्रकृतीच्या अनेक शक्ती आहेत. प्रत्येक शक्तीची वेगवेगळी अधिष्ठात्री देवता आहे. ज्याप्रमाणे सरकारमध्ये वेगवेगळी कामे करण्यासाठी वेगवेगळे विभाग असतात. प्रत्येक विभागाचा एक विभाग प्रमुख असतो. त्याचप्रमाणे हे आहे. उदाहरणार्थ वरूण देवता ही जलाची देवता आहे. लक्ष्मी समृद्धीची देवता आहे, गणेश विद्येची देवता आहे. परंतु ज्याप्रमाणे त्या सर्व विभाग प्रमुखांना मंजुरी देणारा पंतप्रधानांचा विभाग असतो, त्याप्रमाणे या सर्व देवतांना क्षमता देणारा परमात्माच असतो. परंतु हे न जाणल्यामुळे लोक विविध देवतांची उपासना करतात.
येऽप्यन्यदेवता भक्ता, यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय, यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।
नरहरी सोनार पंढरपूरमध्ये राहत होते. ते शंकराची आराधना करत असत. ते अतिशय सुंदर दागिने बनवत असत. एकदा त्यांच्याकडे एक व्यक्ती आली. "जर मला संतानप्राप्ती झाली तर मी पांडुरंगासाठी एक सोन्याचा कंबरपट्टा बनवेन" असा नवस त्या व्यक्तीने बोलला होता. तो नवस त्या व्यक्तीला पूर्ण करावयाचा होता. त्यांना कोणीतरी नरहरी सोनारचे नाव सांगितले. ते नरहरी सोनाराकडे आले. नरहरी सोनार म्हणाले, "तुम्ही मला पांडुरंगाच्या कमरेचे माप आणून द्या. कारण मी त्या देवळात जाऊ शकत नाही. मी शैव आहे. मी पांडुरंगाला मानत नाही." त्याप्रमाणे याजमानांनी नरहरी सोनाराला कमरेचे माप आणून दिले आणि नरहरींनी अतिशय सुंदर असा रत्नजडित कंबरपट्टा पांडुरंगासाठी बनवला. यजमान अतिशय प्रसन्न झाले. पांडुरंगाला घालण्यासाठी जेव्हा ते कंबरपट्टा घेऊन गेले तेव्हा तो कंबरपट्टा अतिशय ढिला झाला. ते तो कंबरपट्टा घेऊन नरहरी सोनाराकडे आले आणि त्यांना तो कंबरपट्टा छोटा करण्यास सांगितला. नरहरींनी पट्टा छोटा करून दिला तेव्हा तो फारच छोटा झाला. असे तीन-चार वेळा झाले. शेवटी यजमान म्हणाले कृपया आपण स्वतः येऊन माप घ्यावे. परंतु नरहरी सोनार म्हणाले मी तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही. मग शेवटी ते डोळ्याला पट्टी बांधून कमरेचे माप घेण्यासाठी मंदिरात गेले. ज्या क्षणी त्यांनी पांडुरंगाच्या कमरेला हात लावला त्यांना शंकराच्या पिंडीचा भास झाला. त्यांनी पटकन डोळ्याला बांधलेली पट्टी बाजूला सरकवली तर पांडुरंग आपल्या कटेवर कर ठेवून उभे होते. परत पट्टी बांधली आणि कमरेचे माप घेण्यास गेले तर परत शंकरांच्या पिंडीचा भास झाला. तेव्हा नरहरी सोनारांना कळले की त्यांच्या डोळ्यावरची अज्ञानाची पट्टी बांधली होती ती दूर करण्यासाठी भगवंतांनी ही लीला केली.
अहं(म्) हि सर्वयज्ञानां(म्), भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति, तत्त्वेनातश्च्यवन्ति ते।।9.24।।
यान्ति देवव्रता देवान्, पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।
(पितर म्हणजे आपले पूर्वज - जे देह सोडून गेले आहेत परंतु चैतन्य रूपाने येथे आहेत. आपण श्राद्ध करून त्यांची आराधना करतो)
पूर्वजांचे गुण आपोआपच पुढील पिढीत संक्रमित होतात. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या गोष्टींच्या आधारे आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो.
आज मी आपल्यापुढे गीतेचे विवेचन करत आहे परंतु याच्यामागे माझे सासरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते संस्कृत पंडित प्रज्ञाभारती श्री. श्री. भा. वर्णेकर यांनी केलेली आराधना आहे. घरातील त्या संस्कृतच्या लहरींमुळे मी हे गीतेचे ज्ञान आपल्यापुढे प्रवाहित करू शकत आहे. पितरांच्या कृपेमुळे हे असे शक्य होऊ शकते. भूतमात्रांची अर्चना करणारे तेथपर्यंत पोहोचू शकतात. भूत या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे अतृप्त आत्मा आणि दुसरा म्हणजे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला. अतृप्त आत्म्यांची किंवा पंचभूतांपासून निर्माण झालेल्यांची आराधना करणारे सुद्धा तेथे पोहोचतात . भौतिक गोष्टींचे, तत्त्वांचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ तेथपर्यंत पोहोचू शकतात.
परंतु कुठल्याही दैवताची आराधना करत असताना ही परमात्म्याची आराधना आहे या वृत्तीने जे आराधना करतात, हा भाव मनात ठेवून जे आराधना करतात, ते मलाच येऊन मिळतात.
येथे अर्जुनाच्या पुढे निश्चितच मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की जेव्हा आपण परमेश्वराची आराधना, पूजा घरात करतो तेव्हा अनेक गोष्टींचा उपयोग करतो. परंतु मी तर युद्धभूमीवर आहे अशा प्रसंगी परमेश्वराची आराधना कशी करावी? याचे उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात.
पत्रं(म्) पुष्पं(म्) फलं(न्) तोयं(य्ँ), यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं(म्) भक्त्युपहृतम्, अश्नामि प्रयतात्मनः॥9.26॥
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्।।९.११।
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
कबीरजी म्हणतात,
यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।
सोळाव्या अध्यायात विविध प्रकारच्या तपांचे वर्णन केले आहे.
क्षमा द्वन्द्वसहिष्णुत्वं हीरकार्यनिवर्तनम्।।
अर्थात - आपल्या स्वधर्मानुसार प्राप्त कर्तव्य कर्माचे निष्ठेने पालन करणे ही तपस्याच आहे. मनाला काबूत ठेवणे हे दमन होय. सुख-दुःख, लाभ-हानी यांच्याप्रती समभाव राखणे क्षमा आहे तर वर्ज्य कार्य त्यागणे ही लज्जा होय.
स्वधर्माचे पालन करत असताना मनुष्याला कष्ट सहन करावे लागतात. कर्तव्य कर्म करत असताना कष्ट होतात. सेवा करत असतानाही कष्ट होतात. हे सर्व तपच आहेत. कर्म हेच आपले यज्ञ कर्म आहेत.
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।
तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ ४०० ॥
अर्थ -जे जे कर्म, जसे जसे तुझ्याकडून स्वभावत: घडेल (मग ते सांग असो अथवा असांग असो) ते सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ आहे अशा समजुतीने कर. ॥९-४००॥
ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं । माझियां हातीं ॥ ४०१ ॥
परंतु अमूक कर्म मी केले, अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामधे ठेऊ नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून (कर्तृत्व अभिमानरहित होऊन) मला अर्पण कर. ॥९-४०१॥
शुभाशुभफलैरेवं(म्), मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
सन्न्यासयोगयुक्तात्मा, विमुक्तो मामुपैष्यसि।।9.28।।
समोऽहं(म्) सर्वभूतेषु, न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां(म्) भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्।।29।।
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।
जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥
भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमधे सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, ॥९-४०७॥
भगवंत सर्वांसाठी समान असतात दुर्योधनाने १ औक्षोहिणी सेना मागितली ती भगवंतांनी त्याला दिली. अर्जुनाने भगवंतांना मागितले. ते त्याला मिळाले.
अपि चेत्सुदुराचारो, भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः(स्), सम्यग्व्यवसितो हि सः।।9.30।।
क्षिप्रं(म्) भवति धर्मात्मा, शश्वच्छान्तिं(न्) निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि, न मे भक्तः(फ्) प्रणश्यति।।9.31।।
यालागीं दुष्कृती जर्ही जाहला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला ।
न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥
अर्थ- याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चात्तापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला ॥९-४२०॥
भगवंत पुढे म्हणतात असा पश्चात्तापदग्ध मनुष्य लगेच धर्मात्मा बनतो.
सातव्या अध्यायात भगवंत म्हणतात
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते |
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: || 7.19||
योगी सुद्धा अनेक जन्मांच्या सिद्धी नंतर भगवंताजवळ पोहोचतो.
मां(म्) हि पार्थ व्यपाश्रित्य, येऽपि स्युः(फ्) पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा:(स्), तेऽपि यान्ति परां(ङ्) गतिम्।।9.32।।
किं(म्) पुनर्ब्राह्मणाः(फ्) पुण्या, भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं(म्) लोकम्, इमं(म्) प्राप्य भजस्व माम्।।9.33।।
मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां(न्) नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवम्, आत्मानं(म्) मत्परायणः।।9.34।।
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥
अर्जुना, तो जी कर्मे करील, ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करील तो माझा जप होय आणि तो ज्या स्थितीत असेल, ती माझी समाधिअवस्था होय. ॥१८-११८१॥
परंतु त्यासाठी अंतकरण निर्मल असले पाहिजे. पाप पुण्याच्या कल्पना यासोबत जोडू नये.